महाराष्ट्राच्या राजकारणात मागील अनेक महिन्यांपासून आपण विविध राजकीय घडामोडी पाहत आलो आहे.. यात मोठे पक्ष फुटले, त्यांचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी इकडून तिकडे गेले; अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यात अनेकदा मतदार राजा संभ्रमात होता की त्यांचा लोकप्रतिनिधी आमदार, खासदार नेमका कोणत्या पक्षात आहे? त्याला मत देऊन तो त्याच पक्षात राहील की नाही याची भीती मागील ३-४ वर्षांपासून राज्यातील मतदार बाळगून आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर आपण मागील काही दिवसांपासून एका फोडफोडीच्या ऑपरेशन बद्दल सतत ऐकून आहोत, ते म्हणजे “ऑपरेशन टायगर”. होय हे ते ऑपरेशन टायगर आहे ज्याने शिवसेना पक्षाचे २ भाग केले, अखंड शिवसेना दुभागली. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे ४० आमदार आणि अनेक खासदास घेऊन सुरत, गुवाहाटी करत राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आणि शिवसेना पक्ष, नाव आणि चिन्ह सुद्धा मिळवले.. तर दुसरीकडे ठाकरेंकडे फक्त बोटावर मोजण्याइतके शिलेदार राहीले, त्यानंतर सुद्धा अनेक सहकारी, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेले.
आता या गोष्टींना जवळपास ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेला. परंतु अजूनही ठाकरेंचे उरलेले आमदार, खासदार, पदाधिकारी फोडण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आग्रही असल्याचं दिसत आहे; आणि हेच “ऑपरेशन टायगर” आहे. आणि म्हणूनच मागील २-३ दिवसांपासून राज्यात अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा ठाकरेंचे ८-९ आमदार, खासदार फोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हादरा देण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यामुळेच मागील २ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या वोल्टास कंपनी परिसरात ठाकरेंच्या उर्वरित ८-९ खासदारांची एकत्रित मीटिंग घेतल्याची चर्चा आहे. या घटनेला अनेक माध्यमांनी दुजोरा दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार माध्यमांवर समोर येऊन आम्ही त्या मीटिंगला गेलो नव्हतो, आम्हाला असे कोणतेही निमंत्रण नव्हते, आम्हाला तिकडे जायची गरज नाही; अशा प्रकारे स्वतःची बाजू मांडत आहेत. यात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत खासदार अरविंद सावंत यांचे सुद्धा नाव आल्याने त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडताना “मी कुठेही जाणार नाही” असे उद्गार काढले होते.
त्यानंतर ते मुंबईत परतले असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची त्यांच्या वांद्रे पूर्व येथील मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक बोलावून घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व खासदारांशी चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सर्व खासदारांनी आपण शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना सोडून अन्य कुठेही जाणार नसल्याची शपथ घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीची रणनीती आखली..
