मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार सुरेश धस यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला असून, तो नेता बीड जिल्ह्यातील असल्याचे सूचित केले. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे का? असा थेट सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भेटीमागील सत्य काय?
बावनकुळे यांनी स्वतः खुलासा करत सांगितले की, त्यांनीच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांना एकत्र येण्यास सांगितले होते. दोघांमधील मनभेद दूर करण्याच्या उद्देशाने एकत्र जेवणाची योजना आखली गेली. या पार्श्वभूमीवरच मुंडे आणि धस यांची भेट झाली होती.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले होते. तसेच, त्यामागे धनंजय मुंडे यांचे समर्थन असल्याचा धस यांचा आरोप होता. या संपूर्ण घडामोडी दरम्यान, धस यांनी मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. यावर संजय राऊत यांनी संशय व्यक्त करत, ही बैठक काही डीलसाठी घेतली गेली होती का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “कुठेतरी काहीतरी गडबड आहे,” असे विधान केले.
बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर उडाली खळबळ
या संपूर्ण वादाला अधिक हवा तेव्हा मिळाली, जेव्हा बावनकुळे यांनी स्वतः खुलासा केला की, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची दोनदा भेट झाली. पहिली बैठक बावनकुळे यांच्या घरी झाली होती, तर दुसरी थेट धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी चार ते साडेचार तास चालली. मात्र, सुरेश धस यांनी मात्र यावर आक्षेप घेत, आपण फक्त २० ते ३० मिनिटांसाठी भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले. तसेच, आपल्या विरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला.
या राजकीय नाट्यावर भविष्यात काय निष्पन्न होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.