पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंडमधील गोळीबार प्रकरणावरून आपल्या पक्षातील नेत्यांना थेट इशारा दिला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी भर सभेत हाताने बंदुकीची ॲक्शन करत उपस्थित कार्यकर्त्यांना टोचून सांगितलं – “तुम्ही आता पक्षाचे पदाधिकारी आहात, कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, ठोय ठोय करू नका, ढगात गोळी मारू नका.”
या कार्यक्रमाला भोरचे आमदार शंकर मांडेकरही उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्याच भावावर चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उपस्थित नेत्यांना चूक टाळण्याचा सल्ला दिला.

“बदनामी आपल्या पक्षाचीही होते”
अजित पवार म्हणाले, “तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, सहकारी आहात, त्यामुळे कुठेही चुकीचं वर्तन झालं तर त्याचा परिणाम तुमच्यावरच नाही तर पक्षावरही होतो. म्हणूनच कुठेही जाऊन बिनधास्तपणे वागू नका. ढगात गोळी मारणं, ठोय ठोय करणं थांबवा. हे सगळं पक्षासाठीही अपयशाचं कारण ठरू शकतं.”
वैष्णवी हगवणे प्रकरणावरही भाष्य
याच भाषणात अजित पवारांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावरही स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही लग्नाला गेलो म्हणून त्याला दोष का? आम्ही कोणाला त्रास द्यायला सांगितलं होतं का? जर माहिती असती की पुढे काही अडचण होणार आहे, तर आम्ही तिथे गेलोच नसतो.”
हशा पिकवणारी अॅक्शन
अजित पवारांनी बोलताना अचानक हाताने बंदुकीची ॲक्शन केली आणि म्हणाले, “ठोय ठोय करू नका!” यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण या हास्याच्या आड अजित पवारांनी पक्षातील शिस्तीबाबतचा स्पष्ट संदेश दिला – “आपापसात सलोखा ठेवा, आणि कोणत्याही वादात पक्षाला ओढू नका.”
या साऱ्या भाषणातून अजित पवारांनी पक्षातील कार्यकर्त्यांना जाहीर इशारा दिला आहे – वागण्यात संयम ठेवा, नाहीतर पक्षाची प्रतिमा मलीन होते!