राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्यातील वाढती जवळीक. गेल्या १५ दिवसांत या काका-पुतण्यांनी तब्बल चार वेळा भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पुण्यातील साखर संकुल येथे दोघांमध्ये नुकतीच एक १५ मिनिटांची स्वतंत्र बैठक झाली असून, या बैठकीने राजकीय चर्चांना नवा रंग चढवला आहे.

पुण्यात पार पडलेल्या या बैठकीपूर्वी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर यासंदर्भात एक औपचारिक चर्चा झाली. या बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मात्र या अधिकृत चर्चेनंतर शरद पवार यांच्या दालनात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गोपनीय बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार यांची एकापेक्षा एक वेगवेगळ्या कार्यक्रमांत भेट झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही दोघे एकत्र आले होते, आणि त्यावेळी ते एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले होते. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या बैठकीदरम्यानही अजित पवार यांनी थेट शरद पवार यांची केबिनमध्ये जाऊन भेट घेतली होती. शिवाय जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातही दोघे एकत्र आले होते, आणि त्या वेळी अजित पवार स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून शरद पवारांचे स्वागत करताना दिसले होते.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे यात कोणताही राजकीय अर्थ काढू नये. ते म्हणाले, “शरद पवार ज्या संस्थांचे अध्यक्ष आहेत, त्यात मी सदस्य म्हणून काम करतो. काहीवेळा असे विषय असतात, जे राजकारणाच्या पलिकडे असतात.” दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील सर्व कुटुंबांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनीही सोशल मीडियावरून पवार कुटुंब एकत्र यावं असा संदेश दिला होता. यामुळे पवार घराण्यातील नातेसंबंध पुन्हा सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राजकीय पातळीवर अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
या सलग भेटी आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात अजित पवार आणि शरद पवार यांच्या संबंधात कोणते नवे समीकरण तयार होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.