सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हं दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे. अनेकांना असं वाटतंय की, दोघेही एकत्र आल्यास महाराष्ट्रात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. विशेषतः मराठी अस्मितेसाठी ही जोडणी फायद्याची ठरेल, असा जनतेचा विश्वास आहे.

राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत या विषयावर मत व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वैयक्तिक मतभेद गौण आहेत. एकत्र येणं फार अवघड नाही, गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, हा निर्णय केवळ त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा नाही, तर मोठ्या चित्राचा विचार करून घेतला पाहिजे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही एक सकारात्मक संकेत दिला. त्यांनी एकत्र येण्याला होकार दिला, मात्र यामध्ये फक्त महाराष्ट्राचं हित पाहिलं जाईल, अशी अट घातली. त्यामुळे या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सर्व स्तरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या घडामोडींमध्ये एक मराठी सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘राज का रण’ या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एक सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सिनेमात प्रसाद ओक यांनी राज ठाकरे आणि दीपक करंजीकर यांनी उद्धव ठाकरे यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात एक सीन आहे जिथे विभक्त झालेले दोन भाऊ अखेर एकत्र मंचावर येतात. या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील हलताना दाखवला आहे, आणि त्या दृश्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतात.
हा सीन सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटलं, “महाराष्ट्राला तुम्हा दोघांची गरज आहे, एकत्र आलात तरच काही बदल होईल.” दुसऱ्याने लिहिलं, “भाऊ एकत्र येणं काळाची गरज आहे, स्वार्थ बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र या.”
अनेक जण या व्हिडिओतून प्रेरणा घेत राजकीय पातळीवर देखील अशीच एकजूट घडून यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
सध्या हे सगळं पाहता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर खरोखरच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळू शकते. जनतेचीही हीच अपेक्षा आहे की, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेते एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी एक नवा अध्याय लिहितील.