पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि भूतपूर्व आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लवकरच ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संग्राम थोपटे यांना गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसकडून अपेक्षित स्थान मिळाले नाही. २०१९ मध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोपटे यांचे नाव पुढे आले होते, मात्र त्यावेळी त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान मंत्रिपदाची संधीही त्यांच्या हातून निसटली. पक्षाकडून वारंवार झालेल्या दुर्लक्षामुळे आणि राजगड सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मिळणाऱ्या मदतीतही अडथळे निर्माण झाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
भोर मतदारसंघात थोपटे कुटुंबीयांचा गेल्या चार दशकांपासून मजबूत प्रभाव राहिला आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. अनंतराव थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठे योगदान दिले होते. त्यांची पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात जबरदस्त पकड होती. संग्राम थोपटे यांनीही वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत तीनदा भोरमधून आमदार म्हणून विजय मिळवला. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
काँग्रेसमधील अन्यायकारक वागणूक आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. २० एप्रिलला भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
थोपटे कुटुंबीयांचा बारामतीच्या पवार कुटुंबीयांशी जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून संग्राम थोपटे भोर आणि आसपासच्या भागात नवे राजकीय समीकरण तयार करू शकतात. त्यांच्या पक्षांतरामुळे पुणे जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत.
संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला, तर भोर मतदारसंघातील काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.