राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची सक्ती घडवून आणण्याच्या प्रयत्नांमुळे राजकीय वादळ उठले असून, शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अखिल चित्रे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या भूमिकेवर कठोर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी सरकारकडे विचारले आहे की, कोणत्या कायद्याच्या आधारे हिंदी भाषा सक्ती केली जात आहे? तसेच, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. फक्त पक्षाशी गद्दारी करून थांबत नाही, तर तुम्ही मातृभाषा आणि महाराष्ट्राशीही गद्दारी करत आहात, असा घणाघात त्यांनी केला.
चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले की, भारतीय राज्यघटनेनुसार हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार हिंदी ही केवळ संघराज्याची कामकाजाची भाषा आहे, राष्ट्रभाषा नाही. तसेच, कलम 345 नुसार प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत भाषा ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रासाठी मराठी ही प्रमुख भाषा असून, तिच्या स्थानावर अन्य भाषेची सक्ती करणे घटनाविरोधी आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.
त्यांनी संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या 22 अधिकृत भाषांचा संदर्भ देऊन स्पष्ट केलं की, मराठी ही त्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. त्यामुळे हिंदीची सक्ती करून स्थानिक भाषेचा अपमान करणं योग्य नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.
या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात तणाव वाढला आहे. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रमुख नेते असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अखिल चित्रे यांच्या आरोपांनंतर संजय शिरसाट काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील राजकीय वर्तुळात या वादामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मातृभाषेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने, भविष्यात हा वाद आणखी उग्र स्वरूप धारण करू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.