भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहत त्यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना करावी, असं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, धनंजय मुंडे हे पुन्हा एका मोठ्या पदावर येऊन समाजाची सेवा करावी, हीच त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, “महंत नामदेव शास्त्री काय बोलले यावर मी जास्त काही बोलणार नाही. कारण भगवानगड आणि त्या गादीचा आम्ही सन्मान करतो. मात्र जर धनंजय मुंडे पुन्हा सत्तेवर आले, तर बीड जिल्ह्यात पुन्हा अन्याय, अत्याचार आणि गुंडगिरीचा भडका उडेल. सरकारलाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
ते पुढे म्हणाले की, “जेव्हा गोपीनाथ मुंडे होते तेव्हा जिल्ह्यात शिस्त होती. मात्र नंतरच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर झाला आणि गुंडगिरी वाढली. खंडणीचे प्रकार घडले, हत्या झाल्या आणि सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदावर येणं म्हणजे जिल्ह्याला पुन्हा अशांततेच्या गर्तेत लोटणं होईल.”
मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “आम्ही गादीचा आदर करतो, त्यामुळे त्यांचं बोलणं आम्ही दुर्लक्ष करतो. त्यांच्या वाऱ्याने आम्हाला फरक पडत नाही. मात्र, जर सरकारने चुकीचे निर्णय घेतले आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही आमचा पवित्रा बदलू. देशमुख कुटुंबावर अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमचा विरोध तीव्र करू.”
त्यांनी असा इशारा दिला की, सध्या काही प्रतिनिधी सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने काही गोष्टी गुपचूप ठरवत आहेत. त्याचीही पूर्ण माहिती आमच्याकडे आहे आणि योग्य वेळी त्यावर आम्ही भूमिका घेऊ.
एकंदरीत, भगवानगडाच्या महंतांच्या समर्थनामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि मराठा आरक्षण चळवळीत नव्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.