नाशिकमध्ये काल उद्धव ठाकरे गटाने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात, स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सादर करण्यात आले. या अभिनव उपक्रमावर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र, आज खासदार संजय राऊत यांनी या टीकेला रोखठोक उत्तर दिलं.

संजय राऊत म्हणाले, “ज्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून बनावट शिवसेना उभी केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील आणि शिवसेनेचे संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर आम्हालाच बोलण्याचा अधिकार आहे. विरोधकांनी हा विषय चघळू नये.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “अमित शाह यांनी एक बनावट संघटना तयार करून निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळवलं. त्यामुळे आज जे लोक बाळासाहेबांच्या वारशावर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत, त्यांचा त्या वारशाशी काहीही संबंध नाही.”
आणखी जोरदार टीका करताना संजय राऊत म्हणाले, “तंत्रज्ञान आणि विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः AI च्या मदतीने देशाचा विकास कसा होईल याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मग आम्ही जर बाळासाहेबांच्या आठवणींना जिवंत करण्यासाठी AI वापरत असलो, तर त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कुणाला आहे?”
त्यांनी आनंद दिघे यांच्या संदर्भातही विरोधकांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, “धर्मवीर नावाचा सिनेमा आणि वेब सीरिज तयार करून आनंद दिघे यांच्या जीवनावर बनावट कथा उभ्या करण्यात आल्या. आम्ही आनंद दिघे यांच्यासोबत खूप जवळून काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर भाष्य करण्याचा खरा अधिकार आमच्याकडे आहे. विरोधकांनी आम्हाला धर्मवीरबद्दल शिकवू नये.”
संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांना विचारलं, “जर आम्ही अमित शाहांवर काही म्हटलं असतं, तर तुमचा राग रास्त असता. पण इथे तर आपण आपल्या पक्षप्रमुखांविषयी बोलतो आहोत. त्यामुळे तुमचा या विषयाशी काहीही संबंध नाही.”
संपूर्ण संवादात संजय राऊतांनी विरोधकांची भूमिका बनावट असल्याचे ठामपणे सांगितले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती आणि वारसा जतन करण्याचा आपला अधिकार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं.