नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात एक विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) तंत्रज्ञानावर आधारित आवाजातील भाषण. या भाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यावरून सत्ताधारी गटाने जोरदार टीका केली आहे.

या AI भाषणात शिवसेनेतील फूट, निष्ठावंत व गद्दार याविषयी भाष्य करण्यात आले. बाळासाहेबांचा आवाज आणि विचार यांचा संगम दाखवण्याचा प्रयत्न या भाषणातून करण्यात आला, मात्र हेच मुद्दे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. खासदार नरेश म्हस्के, जे एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आहेत, यांनी या प्रकारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
“खरे विचार आमच्यासोबत, बनावट आवाजाचा आधार का?”
नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं, “आज उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा आधार घ्यावा लागत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. बाळासाहेबांचे खरे विचार आज आमच्याकडे आहेत. जेव्हा विचार संपतात, तेव्हा बनावट कॅसेट्स वापरण्याची वेळ येते.”
“बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल?”
शिंदे गटाने हा प्रकार म्हणजे बाळासाहेबांचा अपमानच असल्याचं मत मांडलं आहे. “ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला, तेच आता त्यांच्या आवाजाचा वापर करून आमच्यावर टीका करत आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल याचा विचार करा,” असं म्हणत म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“तुमचं हिंदुत्व जगाला ठाऊक आहे”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर हल्लाबोल केला. याला उत्तर देताना म्हस्के म्हणाले, “बाळासाहेबांनी वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. मेळावा मैदानात घ्यायला हवा होता, सभागृहात नाही. शिवाजी महाराजांचा अनादर कोणी केला? सावरकरांचा अपमान कोणी केला? तुमचं खोटं हिंदुत्व सर्वांना माहीत आहे.”
“दाढी, तलवार आणि मनगट विसरून जा”
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदेंवर टीका करताना त्यांच्या दाढीचा उल्लेख केला होता. यावर प्रत्युत्तर देताना म्हस्के म्हणाले, “हातात तलवार घेण्यासाठी मनगटात ताकद लागते. केवळ फेसबुकवर सक्रिय राहून काही होत नाही. छत्रपतींचा विचार हृदयात असायला हवा, ती जाणीव तुमच्यात नाही. त्यामुळे दाढी, तलवार आणि मनगट या गोष्टी विसरल्येलं बरं.”