नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं ‘निर्धार शिबिर’ भरले असून, या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “शहरांतील समस्या म्हणजे रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, कचऱ्याचं व्यवस्थापन – यावर बोलताना असं वाटलं की, प्रत्येक विभागात असं शिबिर व्हायला हवं, जेणेकरून दिशा आणि योजना ठरवता येतील.”

आदित्य ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण सांगताना नमूद केलं, “मी लहानपणापासून वडील उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यांवर जायचो. एकदा दहावीच्या परीक्षेच्या चार दिवस आधी देखील श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी नाशिकला येण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मी संजय राऊत यांना विचारलं – ‘संजयकाका, उद्या मी काय बोलायचं?’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं – ‘महाराष्ट्र चाललाय तरी कुठे?’ आणि खरंच, आजचा मोठा प्रश्न हाच आहे.”
सरकारच्या पहिल्या 100 दिवसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रत्येक नवीन सरकारच्या सुरुवातीचे दिवस ‘हनीमून पीरियड’सारखे असतात, त्यात मुख्यमंत्री काही निर्णय घेतात आणि त्यांचं कौतुक होतं. पण या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी एकही ठोस योजना आणली आहे का?”