डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवर जोरदार टीका केली. आपल्या नेहमीच्या ठाम आणि परखड शैलीत कंगनाने म्हटलं की, नेहरूंनी संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा अपमान केला होता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना देवासारखं मान दिलं.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथील कार्यक्रमात बोलताना, कंगनाने असा दावा केला की, पंडित नेहरू आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा हेवा करत होते, त्यामुळे त्यांनी आंबेडकरांना पदत्याग करण्यास भाग पाडलं. याउलट मोदी सरकारने बाबासाहेबांना केवळ भारतरत्नच दिलं नाही, तर त्यांचे जीवनाशी संबंधित ‘पंचतीर्थ’ निर्माण करून त्यांना पूजनीय स्थान दिलं, असं कंगना म्हणाली.
तिने काँग्रेसवरही जोरदार टीका केली. तिच्या मते, काँग्रेसने लोकांना वर्षानुवर्षे केवळ भ्रमात ठेवून मतांसाठी आंबेडकरांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला आहे. संविधानाच्या प्रती हातात घेऊन आज त्या पक्षाने मतांचं राजकारण चालवलं आहे, असं ती म्हणाली.
कंगनाने यावेळी हिमाचल प्रदेश सरकारवरही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या सरकारवर निशाणा साधताना, तिने सांगितलं की अनेक गरीब नागरिक आपली जमीन हडप झाल्याच्या तक्रारी घेऊन तिच्याकडे येतात. अपंग आणि विधवांना मिळणाऱ्या पेन्शनसारख्या सुविधा बंद झाल्याचाही आरोप तिने केला.
तसेच, राज्य सरकारमधील काही मंत्री लोकांच्या फोन कॉल्सना उत्तर देत नाहीत, अशी तक्रारही तिने केली. याच मुद्द्यावरून तिने काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत, “मंडीच्या मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसला महागात पडेल,” असं म्हणत महिला शक्तीने दिलेल्या पाठिंब्याबद्दलही गौरव केला.