पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या हिसारमध्ये झालेल्या सभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेस पक्ष केवळ मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत, त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं की जर त्यांना खरोखर मुस्लिम समाजाबद्दल आपुलकी असेल, तर त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावा आणि आगामी निवडणुकीत 50 टक्के उमेदवार मुस्लिम असावेत.

मोदी म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिम समाजाच्या हितासाठी कधीच ठोस पावलं उचलली नाहीत. त्यांनी केवळ काही कट्टरपंथीयांना खूश ठेवण्यासाठी पावलं उचलली आणि बहुसंख्य मुस्लिमांना शिक्षण, रोजगार आणि विकासापासून दूर ठेवले. वक्फ कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे गरजूंना न मिळता भू-माफियांना जमीन आणि संपत्तीचा लाभ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, नव्या वक्फ कायदा सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम कुटुंब, महिला, विधवा आणि मुलांना त्यांचे हक्क मिळतील आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होईल. हेच खरे सामाजिक न्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोबर काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोपही मोदींनी केला. संविधानाच्या नावावर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने त्याचा उपयोग केला आणि आणीबाणीच्या काळात तर संविधानाच्या आत्म्यावरच घाला घातल्याचं त्यांनी सांगितलं.