छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून, खासदार संदिपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. खैरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं की, आज खैरेंना कोणी ओळखत नाही. त्यांनी आता घरी बसून आपली नातवंडं सांभाळावी.

पाणीपुरवठा योजनेवरून वाद
भुमरे यांनी सांगितलं की, छत्रपती संभाजीनगरसाठी पाणीपुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, हे श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. योजनेचा उगम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला, परंतु त्याकाळात काम पुर्णत्वास जाऊ शकलं नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
शिंदेंच्या नेतृत्वात प्रगतीचा दावा
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यानंतर या योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर केला. त्यामुळे काम वेगानं पुढे सरसलं,” असं भुमरे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी खैरेंना ‘ढोंगी’ अशी उपमा देत शहराच्या अडचणींसाठी त्यांनाच जबाबदार ठरवलं.
अंबादास दानवेवरही टीका
फक्त खैरेंवरच नव्हे, तर अंबादास दानवे यांनाही भुमरे यांनी लक्ष्य केलं. “त्यांचा प्रभाव जिल्ह्यात कुठेही दिसत नाही. त्यांचं नेतृत्व कागदापुरतंच सीमित आहे,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला. मिश्किलपणे ते म्हणाले की, “ठाकरे गटात आता खैरे आणि दानवेच उरलेत. वरपाटीवरही ते दोघंच दिसतील!”
भविष्यातील विकासाचं आश्वासन
भुमरे यांनी हेही सांगितलं की, “माझ्या कार्यकाळात एकही गाव, वस्ती, वाडा मी वगळणार नाही. प्रत्येक ठिकाणी पोहोचून जनतेसाठी काम करणार आहे.” पैठण तालुक्यातील ८०% भाग लवकरच पाण्याने समृद्ध होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.