दिल्लीहून एक मोठी बातमी समोर आली आहे — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनिल शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते वारंवार हल्ले करत आहेत.

सुनिल शुक्ला यांच्या मते, हे हल्ले केवळ राजकीय द्वेषातून नव्हे तर भाषिक भेदभावातून होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी, अशी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली आहे.
याच मुद्द्यावर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मा यांनीही संसदेत आवाज उठवला आहे. त्यांनीही हिंदी भाषिकांवरील हल्ले थांबवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
मनसे किंवा राज ठाकरे यांच्याकडून यावर अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. मात्र ही याचिका मनसेसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकते, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.