महाराष्ट्राच्या 2025 च्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प तसेच समृद्धी महामार्गाच्या उर्वरित कामांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प
खोपोली ते खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच इंधन व वाहतुकीवरील खर्चात बचत होईल. यामुळे वाहतूक कोंडीही कमी होऊन प्रवाशांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा लवकरच पूर्णत्वास
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 99% काम पूर्ण झाले असून, यासाठी आतापर्यंत 64,755 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे दरम्यानचा 76 किमी लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित करण्याची योजना असून, त्यामध्ये कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्रांसारख्या महत्त्वपूर्ण सुविधा उभारल्या जातील. हा प्रकल्प प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पुणे आणि मुंबईत मेट्रो विस्ताराला गती
पुणे मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग हे दोन प्रमुख मार्ग समाविष्ट आहेत.
मुंबईतील वाहतूक सुलभ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाच्या विकासाला लवकरच सुरुवात होणार आहे.
राज्यातील पायाभूत सुविधा विकासाला गती
राज्यातील महामार्ग, उड्डाणपूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि अत्याधुनिक वाहतूक सुविधांचा लाभ मिळेल तसेच अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने होण्यास मदत होईल.