वाढवणजवळ उभारणार चौथी मुंबई, विमानतळ आणि बंदराचा विकास वेगाने सुरू
मुंबई आणि एमएमआर (मुंबई महानगर क्षेत्र) च्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात चौथ्या मुंबईच्या उभारणीची घोषणा केली. ही नवीन मुंबई वाढवण बंदराजवळ वसवण्यात येणार असून, त्याठिकाणी एक आधुनिक विमानतळदेखील उभारला जाणार आहे.

वाहतूक सुधारण्यासाठी भव्य प्रकल्प
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम सुरू असून, त्याला जोडून वर्सोवा ते मढ आणि पुढे भाईंदरपर्यंत सी लिंक तयार केला जाणार आहे. तसेच, मढ-भाईंदर सी लिंक पुढे विरारपर्यंत विस्तारला जाईल. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (वेस्टर्न एक्सप्रेस वे) रहदारीचा मोठा भार कमी होणार आहे. सध्या विरारला पोहोचण्यासाठी तीन ते चार तास लागतात, मात्र हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या २५ मिनिटांवर येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मल्टिमॉडल कोरिडॉर आणि नवीन बंदर
विरार ते अलिबागपर्यंत मल्टिमॉडल कोरिडॉर तयार केला जात असून, त्यामुळे मुंबईसाठी सर्क्युलर रोड तयार होईल. याशिवाय, वाढवण येथे देशातील सर्वात मोठे पोर्ट विकसित करण्याची योजना आहे. सध्या जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) हे देशातील ६५% कंटेनर ट्रॅफिक हाताळते. मात्र, नवीन वाढवण बंदर जेएनपीटीच्या तुलनेत तीनपट मोठे असेल. त्यामुळे जागतिक दर्जाच्या जहाजांना येथे थांबता येणार आहे.
चौथ्या मुंबईसाठी भव्य योजना
मुंबईच्या विस्तारासाठी चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ विकसित केली जाणार आहे. तिथेच नवीन विमानतळ तसेच बुलेट ट्रेनचे जंक्शन असणार आहे. याआधी अटल सेतूजवळ तिसरी मुंबई उभारण्याची घोषणा झाली होती, मात्र चौथ्या मुंबईची संकल्पना वाढवण येथे साकार होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्रासाठी दुष्काळमुक्ती प्रकल्प
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांवरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील सात जिल्ह्यांना दुष्काळमुक्त करण्याची योजना आखली आहे. समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीत वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई दूर केली जाणार आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा
या नव्या घोषणांमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला वेग येणार आहे. चौथ्या मुंबईच्या उभारणीसह वाहतुकीच्या नव्या सुविधा आणि पायाभूत प्रकल्प हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.