माजी मंत्री धनंजय मुंडेंना सह-आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी या प्रकरणात मुंडेंवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगविरोधात दाखल असलेल्या हत्येच्या गुन्ह्यात मुंडेंनाही सामील करण्याचा आग्रह वाढत आहे.

सातपुडा बंगल्यावरील बैठकीवरून वादंग
भाजप आमदार सुरेश धस यांनी या संपूर्ण प्रकरणाला आणखी वळण देत दावा केला आहे की, 19 ऑक्टोबर रोजी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील सातपुडा बंगल्यावर एक बैठक झाली होती. या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे आणि एका खाजगी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. आरोपानुसार, या बैठकीतून तब्बल तीन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, चर्चेनंतर हा व्यवहार दोन कोटींवर ठरला आणि त्यापैकी ५० लाख रुपये आधीच देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही हा मुद्दा मिटलेला नाही. विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपपत्रात मुंडेंनाही सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सातपुडा बंगल्यावर झालेल्या बैठकीचा उल्लेख करत याप्रकरणात अधिक चौकशीची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडने हत्येवेळी धनंजय मुंडेंना फोन केला असल्याचा उल्लेख केला आहे.
हे प्रकरण आता अधिक गंभीर वळण घेत असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.