संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधत, “महाराष्ट्राची बदनामी या दोघांमुळे झाली आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागल्याचे सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “70-75 दिवस झाले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. तो अजून सापडत नाही? तो राज्यात नाही तर परराज्यात आहे का? सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का?” असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.
बीडमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट?
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर टीका करत सुळे म्हणाल्या, “इथे कोणता गुन्हा राहिला आहे? खून, भ्रष्टाचार, खंडणी, पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टर घोटाळा, कौटुंबिक हिंसा – आता अजून काही शिल्लक आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरपंच हत्येवरही प्रतिक्रिया
सरपंच हत्या प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या, “‘आवादा’ नावाच्या कंपनीने वेळेत तक्रार केली असती, तर वैभवीच्या वडिलांचा जीव वाचला असता,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर खंत व्यक्त केली.
सुळे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.