ठाणे महानगरपालिकेने मराठीतून पदवी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

“मराठीचा गौरव करायचा की तिचा अपमान?”
यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयाचा कारभार मराठीतून व्हावा असे सांगतात, आणि दुसरीकडे मराठीत शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, आणि आता त्याच भाषेतील पदवीधरांना कमी लेखले जात आहे. हा सरळसरळ मराठी भाषेवरील अन्याय आहे.”
“शिवसेना शांत बसणार नाही!”
राऊत यांनी इशारा दिला की, “फक्त मराठी भाषा दिवस साजरा करून मराठी टिकणार नाही. तिच्या हक्कांसाठी लढावे लागेल. आम्ही या निर्णयाविरोधात आंदोलन करणार. ठाणे हे मराठी संस्कृतीचे केंद्र असून, अशा निर्णयांनी मराठी भाषेच्या सन्मानाला धक्का पोहोचतो.”
“सामान्य जनतेला संघर्ष, आणि नेत्यांना आलिशान गाड्या!”
राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले, “सामान्य जनता एसटी बसमध्ये प्रवास करत असताना त्यांना असुरक्षित वाटते, आणि नेते मात्र आलिशान मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यूसारख्या गाड्यांमध्ये फिरतात. या गाड्या त्यांना कुणी दिल्या? कोणाच्या पैशातून आल्या? दुसरीकडे, जे मराठीमध्ये शिकले आहेत, त्यांना अन्यायकारक निर्णयाचा फटका बसतो. ही स्थिती लाजीरवाणी आहे.”
“मराठीच्या सन्मानासाठी संघर्ष सुरूच राहील!”
या संपूर्ण प्रकरणावरून संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मराठी भाषेच्या न्यायासाठी शिवसेना सतत आवाज उठवत राहील आणि या निर्णयाविरोधात लवकरच कठोर पाऊले उचलली जातील.