छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या संमेलनात एकूण 29 ठराव मांडले गेले, त्यापैकी एक ठराव मुंडे यांच्या राजीनाम्याशी संबंधित होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्यावर वाढता दबाव येत असल्याने हा ठराव विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधक त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. याशिवाय भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच मुंडे यांच्या शपथपत्रातील कथित खोट्या माहितीबाबत दाखल झालेल्या तक्रारीमुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.
राजकीय आणि सामाजिक स्तरावर या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांच्या भविष्यासंदर्भात मोठी चर्चा रंगली असून, त्यांच्या राजकीय प्रवासावर याचा किती प्रभाव पडतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.