राज्यात नुकतेच जाहीर झाले आहे की इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा शिकवणे बंधनकारक असेल. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदीही शिकावी लागणार आहे. इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असतील.
या निर्णयावर राज्यभरात विविध स्तरांवर टीका आणि चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेदेखील आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

हेमंत ढोमेने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत हिंदीच्या सक्तीविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्याने लिहिले, “भारत हे संघराज्य आहे. प्रत्येक राज्याला आपली संस्कृती, भाषा आणि परंपरा जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. मग संपूर्ण देशाला एकाच भाषेच्या आहारी का घालायचं?”
तो पुढे म्हणतो, “प्रत्येक राज्याला आपली भाषा आणि संस्कृती जोपासायची मुभा असली पाहिजे. हिंदी ही व्यवहाराची भाषा असू शकते, पण ती आमच्या माथी जबरदस्तीने मारू नका. व्यवहारापुरती ती येतेच आहे. मग हा अट्टाहास कशासाठी?”
आपल्या पोस्टमध्ये हेमंतने मराठी भाषा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे. “महाराष्ट्रात मराठीच फुलली पाहिजे. पुढच्या पिढ्यांच्या अंगाखांद्यावर मराठीच बहरली पाहिजे,” असे भावनिक आवाहन त्याने केले.
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेकांनी हेमंत ढोमेच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. पोस्टच्या शेवटी त्याने #हिंदीसक्तीनकोच असा ठळक हॅशटॅग वापरला आहे, जो अनेक नेटिझन्सनीही आपल्या पोस्टमध्ये सामील केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राजकीय पातळीवरही तीव्र आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी एकीकरण समितीनेही या निर्णयाचा निषेध केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, “प्रेमाने सांगाल तर ऐकू, पण सक्ती केली तर मुळासकट उखडून फेकू.” हिंदीची सक्ती करण्याची आवश्यकता का आहे, असा थेट सवालही त्यांनी केला.
सध्या हा विषय केवळ शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला गेला आहे. त्यामुळे पुढील काळात या मुद्द्यावर अधिक तीव्र राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.