बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला अटक झाली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या टोळीविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं समोर येत आहेत.

या दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी एक खळबळजनक दावा केला आहे – “माझ्याकडे कराडचा बनावट एन्काऊंटर करण्याची ऑफर आली होती.” त्यांच्या या विधानामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही आपली भूमिका मांडली. राऊत म्हणाले, “जर निलंबित अधिकारी म्हणत असतील की त्यांनी पोलिस स्टेशनच्या डायरीत या ऑफरची नोंद केली होती, तर ती अधिक गंभीर बाब आहे. अशा प्रकारची नोंद जर होती, तर त्यावर लगेच कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.”
राऊत यांनी पुढे असेही म्हटले की, “धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित प्रकरणं बघितल्यास असं वाटतं की, कराडचा उपयोग करून त्याला नंतर संपवण्याचा डाव आखला गेला होता. हे केवळ राजकीय की गुन्हेगारी कट आहे, हे समोर यावं.”
तसंच, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं. “आजपर्यंत कोकणात 27 हत्या झाल्या असून त्यातील 9 शिवसैनिकांचे होते. आम्ही गरज पडल्यास तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ,” असंही राऊत म्हणाले.
प्रकरण नेमकं काय आहे?
निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी म्हटलं आहे की, “कराडला अटक होण्याच्या चार दिवस आधी मला त्याच्या एन्काऊंटरसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ती ऑफर नाकारली. माझ्याकडून असा पापाचा भाग होणार नाही, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं.”
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, “परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्ष होत आलं, पण गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आंदोलन केलं, ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब आहे. बीडचे पोलीस अधीक्षक याप्रकरणी जनतेला आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, ही विनंती.”