तहव्वूर राणा याच्या अमेरिकेतील प्रत्यार्पणावर भाजप सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या श्रेयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “सरकारने राणाला भारतात आणले, हे स्वागतार्ह आहे. मात्र, यामागे केवळ भाजपचा यश म्हणून कौतुक करण्याऐवजी हे राष्ट्रीय यश मानायला हवे.”

ते पुढे म्हणाले, “ही प्रक्रिया 2009 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी एनआयएने राणा आणि डेव्हिड हेडलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर चौकशीसाठी भारतीय पथक अमेरिकेला गेले. 2012 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, केवळ एका सरकारचे योगदान नाही.”
राऊतांनी भाजपवर शरसंधान साधत विचारले, “ज्यांना ‘घर में घुसके मारेंगे’ म्हणायचं आहे, त्यांनी पाकिस्तानात अडकलेले कुलभूषण जाधव, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना परत का आणलं नाही?” ते पुढे म्हणाले, “राणाला खटल्यासाठी आणलं आहे की केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी? जर श्रेय घ्यायचं असेल, तर भाजपने पुतळे उभारावेत आणि त्याखाली फोटो काढावेत.”