राज्यात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन देण्यात आलं होतं. सध्या राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेतृत्वात महायुतीची सरकार सत्तेवर असून त्यांनी एकूण 232 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावं लागलं.

या पार्श्वभूमीवर शेतकरी समाज महायुतीकडून दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची वाट पाहतो आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. उलटपक्षी, नेत्यांकडून येणाऱ्या गोंधळात टाकणाऱ्या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या परिस्थितीला विरोध करत प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही सरकारविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया काय?
राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, महायुतीने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आणि हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्याचं वचन दिलं होतं, पण हे दोन्ही आश्वासन हवेत विरली आहेत. शेतकरी नाराज असून, “आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणार आहोत,” असं ते म्हणाले.
“तुमच्याकडे क्षमता नव्हती, तर आश्वासन का दिलं?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी ‘सातबारा कोरा शक्य नाही’ असं सांगितल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि विचारलं की राज्याची परिस्थिती जर इतकीच बिकट असेल, तर खर्चिक प्रकल्प राबवण्याची गरज काय?
शेवटी त्यांनी सरकारला इशारा दिला की, “जर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच ठेवली, तर आम्ही मंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन थेट सवाल करू, आणि त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आणू.”