छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यात आली. जन्मस्थळ किल्ले शिवनेरीसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, या उत्सवात राजकीय वातावरण तापण्याचे कारण ठरले राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट.

राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त ट्विट करताना ‘श्रद्धांजली’ हा शब्द वापरला. त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते – “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी आपल्या साहसाने आणि शौर्याने निर्भयतेने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली असून, त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.” या शब्दांच्या निवडीवरून राजकीय चर्चेला उधाण आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी यावर प्रतिक्रिया देत, “राहुल गांधी यांचा हेतू महाराजांना नमन करण्याचा असून, भाजपकडून यावर राजकारण केले जात आहे,” असे म्हटले.
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवरही आक्षेप घेतला. मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये ‘होमेज’ हा शब्द वापरला होता, ज्याचा मराठीत अर्थ श्रद्धांजली असाच होतो. यावर काँग्रेसने टीका करत मोदींनीही माफी मागावी, अशी मागणी केली.
दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.