शरद पवार गटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केल्यानंतर विधानसभा पातळीवर देखील शरद पवार गटाकडून मोठ्या यशाची अपेक्षा होती. लोकसभेच्या १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळवत त्यांनी ८० टक्क्यांचा स्ट्राईक रेट गाठला होता. मात्र विधानसभा राजकारणात मात्र परिस्थिती उलटी झाली असून गट आता स्पष्टपणे बचावाच्या भूमिकेत गेला आहे.

मागील २४ तासांत शरद पवार गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. या गटाचे जुने व कट्टर समर्थक राहिलेले दोन नेते आता वेगवेगळ्या दिशेने प्रवास करण्याच्या तयारीत आहेत.
पहिला धक्का राहुल मोटे यांच्या रूपाने बसला आहे. भूम-परंडा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले मोटे हे शरद पवारांचे विश्वासू समजले जात होते. मात्र आता त्यांनी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटात मोठी पोकळी निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
दुसरा धक्का बाबाजानी दुर्राणी यांच्या निर्णयामुळे बसला आहे. विधान परिषदेचे तीन वेळा आमदार राहिलेले दुर्राणी देखील आता शरद पवार गटापासून दुरावले आहेत. ते ७ ऑगस्ट रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये दाखल होतील. विशेष म्हणजे दुर्राणी यांना २०१२ व २०१८ साली शरद पवारांनी विधान परिषदेसाठी संधी दिली होती. एकेकाळी अजित पवार यांच्यासोबत गेलेले दुर्राणी, लोकसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटात परतले होते. पण आता ते काँग्रेसच्या दिशेने वळले आहेत.या घटनांमुळे शरद पवार गटातील अस्थिरता आणखी गडद होत चालली आहे. पक्षाच्या भविष्यासाठी ही स्थिती चिंतेची ठरण्याची शक्यता आहे.