वाल्मिक कराड याच्या तुरुंगातील विशेष वागणुकीवरून नवा वाद उफाळला आहे. तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे.

देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, आरोपीला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही बंद करण्यामागे कारस्थान?
वाल्मिक कराड तुरुंगात दाखल झाल्यापासून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नाहीत, असा गंभीर दावा करण्यात आला आहे. ही यंत्रणा का बंद ठेवण्यात आली? आणि त्याचा फायदा कोणाला झाला? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे खिंडकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल होणार
कराडला मदत करणाऱ्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याचे खिंडकर यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण बाब कायद्यासमोर येण्यासाठी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी देशमुख कुटुंबाची भूमिका आहे.