लोकसभेत नुकतेच केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक सादर केले, जे भाजप प्रणीत NDA सरकारने बहुमताच्या आधारावर मंजूर करून घेतले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार असून, त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

या विधेयकावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले, “जर हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे, तर मग भाजपने हिंदुत्व सोडले का? हे लोक एकीकडे औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्ये करतात आणि दुसरीकडे वक्फ बोर्डाच्या हिताचे विधेयक मांडतात. हे केवळ लोकांना गोंधळात टाकण्याचे राजकारण आहे.”
भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “यांचा जमिनीवर डोळा आहे. देशातील इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मुस्लिमांच्या हितासाठी भाषणं दिली. हे वास्तव बघता, मग हिंदूत्वाचं काय झालं? ते सोडलं का?”
तसेच, त्यांनी ३७० कलम हटवल्यानंतरच्या परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला. “किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले? त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या का? काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी जाण्याचा अधिकार का नाही?” असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
भाजपवर जहरी टीका
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले, “नुकतीच ईद झाली. अनेक नेत्यांनी ईदच्या मेजवान्या एन्जॉय केल्या आणि लगेचच वक्फ बोर्डाचं विधेयक मांडलं. हा केवळ योगायोग आहे की नियोजनबद्ध रणनीती?”
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकावर विचारणारा प्रश्न
“बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आज हीच जागा व्यापाऱ्यांच्या आणि उद्योगपतींच्या घशात घातली जाते आहे. भाजपने मुस्लिमांच्या हिताचे विधेयक आणले असेल, तर मग हिंदुत्व सोडलंय का?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.