महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे आठ लाख महिलांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवर परिणाम होणार आहे.

राज्यातील ज्या महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ मिळतो, त्या महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेतून संपूर्ण रक्कम मिळणार नाही. याऐवजी त्यांना दर महिन्याला केवळ ५०० रुपयेच दिले जातील. पूर्वी या महिलांना १५०० रुपये दिले जात होते.
हे बदल योजनेतील अटींमुळे करण्यात आले आहेत. एका लाभार्थीला एकाच वेळी दोन शासकीय योजनांचा पूर्ण लाभ घेता येणार नाही, असे नियम आहेत. ‘नमो शेतकरी’ योजनेतून महिलांना दर वर्षी ६,००० रुपये मिळतात आणि केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेतूनही त्यांना ६,००० रुपये मिळतात. म्हणजेच एकूण १२,००० रुपये वार्षिक लाभ मिळतो. त्यामुळे आता त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून उरलेल्या ६,००० रुपयांचा हप्ता म्हणजेच दर महिन्याचे ५०० रुपयेच मिळतील.
या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता येत्या ३० एप्रिलला, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खात्यात जमा केला जाणार आहे. याआधी या योजनेचे नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.