मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून उध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

रामदास कदम यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे यांनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांनी ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. त्यांच्या या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, “सत्तेच्या जोरावर काही लोक आज मोठ्या गर्जना करत असले, तरी एक दिवस त्यांनाच पुन्हा मातोश्रीच्या दारात यावे लागेल. हे माझे भाकीत नसून ठाम विधान आहे.”
या आरोप-प्रत्यारोपामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी काळात या वादाला कोणती कलाटणी मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.