शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटले की, “पाल मेल्यावर शेपूट वळवळते, आता तेवढीच तुमची शिवसेना उरली आहे!”

ठाकरेंवर थेट निशाणा
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत म्हटले, “सोनिया गांधींचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची जपणूक केली. पण तुमच्या चुकीच्या राजकारणामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झाली आहे.”
संजय राऊतांवरही घणाघात
संजय राऊतांवर निशाणा साधताना कदम म्हणाले, “दिवा विझायच्या आधी जसा फडफडतो, तशीच सध्या संजय राऊतांची स्थिती झाली आहे. त्यांनी आकाशाकडे बघून थुंकले, पण तीच थुंकी त्यांच्यावर परत येत आहे!”
शिंदेंबाबत वक्तव्य
कदम पुढे म्हणाले, “संजय राऊतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसाही स्वप्नात दिसतात. कारण त्यांनी ठाकरे गटाचा पराभव केला आणि भ्रष्टाचार थांबवला.”
कदम यांच्या या आक्रमक टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.