महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी दिलेली विशेष मुलाखत गाजत आहे. या संवादात, उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात पुन्हा एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांनी मोकळेपणाने मत व्यक्त केलं.

महेश मांजरेकर यांनी थेट प्रश्न विचारला की, “आजही लोकांना वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत. हे शक्य आहे का?” या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “माझ्या आणि उद्धव यांच्यातील वाद आणि भांडणं अत्यंत क्षुल्लक आहेत. महाराष्ट्राच्या मोठ्या हितासाठी या गोष्टी दुर्लक्षित करता येतात.”
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भवितव्याची जबाबदारी आपण सर्वांनी ओळखायला हवी. मोठं चित्र पाहिलं पाहिजे. एकत्र येणं किंवा एकत्र काम करणं कठीण आहे असं मला अजिबात वाटत नाही. मात्र, केवळ माझी इच्छा असून उपयोग नाही, समोरच्याचीही तीव्र इच्छा असावी लागते.”
यावेळी शिंदे गटाबाबत विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, “मी कधीही आयत्यापीठावर रेघोट्या मारल्या नाहीत. जेव्हा मी शिवसेनेत होतो, तेव्हा अनेक आमदार आणि खासदार माझ्याकडे येऊ इच्छित होते. पण बाळासाहेबांशिवाय मी कोणाच्याही अधीन राहून काम करायला तयार नव्हतो. मी स्वाभिमान जपत बाहेर पडलो. उद्धवसोबत काम करण्यात मला कधीच अडचण नव्हती, मात्र, समोरच्याची इच्छा असणं गरजेचं आहे.”
महेश मांजरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “महाराष्ट्राला तुमचं एकत्र येणं हवंय.” त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “जर महाराष्ट्राला वाटत असेल की आम्ही एकत्र यावं, तर त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. मी अशा छोट्या-छोट्या मुद्द्यांवर माझा अहंकार आड येऊ देत नाही.”
या मुलाखतीतून स्पष्ट होतं की, राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणीस तयार आहेत, मात्र यासाठी परस्पर इच्छा आणि व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे. मराठी माणसाच्या भविष्याचा विचार करता राज ठाकरे एक नवे दृष्टीकोन मांडताना दिसले आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये नवीन रंग भरला आहे.