गंगाजलाच्या स्वच्छतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये वाद उफाळला आहे. राज ठाकरेंनी गंगेत वाढत्या प्रदूषणावर टीका करत, भाजपच्या ‘नमामी गंगे’ योजनेवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, बाळा नांदगावकरांनी आणलेले गंगाजल प्राशन करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

या वक्तव्यावर संतप्त होत भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, “ईदच्या काळात मोठ्या प्रमाणावर कत्तली होतात आणि त्याचा कचरा पाण्यात मिसळला जातो, त्यावर कोणी काही बोलत नाही. रमजानच्या वेळी काही ठिकाणी संपूर्ण रस्ते अस्वच्छ होतात, तेव्हा कोणालाही प्रश्न पडत नाहीत. मग हिंदू धर्माशी संबंधित विषयांवरच वारंवार चर्चा का केली जाते?”
राणे यांनी पुढे आव्हान दिले की, “जर हिंमत असेल, तर बकरी ईद आणि मोहरमच्या वेळीही असेच सवाल विचारावेत. प्राण्यांना क्रूरपणे मारले जाते, पण त्यावर मात्र कोणीही आवाज उठवत नाही. हिंदू संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करायचे असतील, तर इतर धर्मांवरही तेवढ्याच निर्भिडपणे बोलायची तयारी ठेवा.”
राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून, त्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.