महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे एकत्र येण्याच्या हालचालींना अधिक जोर मिळाला आहे. या शक्यतेने राज्यातील सत्ताधारी शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसते.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोधाने म्हटलं की, “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्ही पेढे वाटू.” त्यांनी स्पष्ट केलं की, शिंदे गटाला कोणताही धोका नाही आणि त्यांच्या सत्तेला कोणतीही बाधा येणार नाही.
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी एकटेच आपल्या पक्षाचा विस्तार केला आणि त्याला टिकवून ठेवलं, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी दरवाजा दरवाजा फिरणाऱ्या लोकांची फौज तयार झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेल्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागला, असेही त्यांनी नमूद केलं.
तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हटलं की, राज ठाकरे यांनी राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले असले तरी, उद्धव ठाकरे यांनी त्यावर योग्य तो प्रतिसाद दिला नाही. “आम्ही संदेश समजून घेणारे आहोत, दूधखुळे नाही,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. त्यांनी पुढे म्हटलं की, जर राज आणि उद्धव यांची युती झाली तर काही लोकांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल, ही भीतीच त्यांना एकत्र येऊ देत नाही.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक कार्टून ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावरही शिरसाट यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, “ते कार्टून पाहून हसू येतं, पण आमच्या उठावामुळे जी आग लागली होती, ती आजही कायम आहे. राऊत आणि त्यांचे सहकारी अजूनही द्विधा मनःस्थितीत आहेत.”
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांवरही शिरसाट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “जर ते एकत्र आले तर त्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. भविष्यात त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र अजून त्यांच्या तोंडून काही स्पष्ट जाहीर झालं नाही.”
एकूणच, राज्याच्या राजकारणात नवे समीकरणे घडण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी काळात याचे परिणाम कसे उमटतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.