नाशिकमध्ये आयोजित केलेल्या एका जाहीर मेळाव्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करतानाच एक ठाम भूमिका मांडली. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीला पाठिंबा देत स्पष्टपणे सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे.”

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी सुचवले होते की, मुंबईच्या राजभवनाच्या जागी शिवरायांचे भव्य स्मारक व्हावे. उद्धव ठाकरे यांनी या मागणीला आपला पाठिंबा जाहीर करत भाषणात म्हटले, “शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताचेही महान नायक आहेत. राज्यपालांपेक्षा शिवरायांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे या जागेचा उपयोग त्यांच्या स्मारकासाठी करावा.”
ठाकरे यांनी आठवण करून दिली की, जेव्हा शिवस्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला, तेव्हा ते स्वतः मोदींसोबत बोटीने समुद्रात गेले होते. “तेव्हा वाटले होते की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार लवकरच स्मारक उभारेल. पण पाच वर्ष झाली तरी एक वीटसुद्धा उभी राहिली नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यपालांच्या निवासस्थानाबाबत त्यांनी सूचकपणे सांगितले, “राज्यपालांना मंत्र्यांच्या एखाद्या रिकाम्या बंगल्यात हलवा. आज अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन बंगले आहेत. त्यामुळे राज्यपाल भवनाची जागा शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी वापरणं हे अधिक उचित ठरेल.”
त्यांनी यावेळी भाजप सरकारवर देखील चांगलाच हल्ला चढवला. “शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आता कृतीतून त्यांच्या विचारांना सन्मान द्यायला हवा. फक्त घोषणांनी किंवा जलपूजन करून काही उपयोग नाही. जर खरोखर शिवरायांचा आदर असेल, तर त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण ठेऊन भव्य स्मारक उभं करणं ही खरी श्रद्धांजली ठरेल.”
उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदावरही टीका करत सांगितलं की, “कोश्यारी साहेबांच्या काळात राज्यपाल पदाची पत कमी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या पदावर ताशेरे ओढले आहेत. जनतेशी थेट संबंध नसलेल्या या पदासाठी इतकी मोठी जागा राखून ठेवणं योग्य वाटत नाही. त्याऐवजी ती जागा जनतेच्या अभिमानाचं प्रतिक असलेल्या शिवरायांच्या स्मारकासाठी वापरली पाहिजे.”
भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, “आम्ही या मागणीला संपूर्णपणे पाठिंबा देतो. आता सरकारने यावर गांभीर्याने विचार करून पुढे पाऊल उचलायला हवे.”