मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने हे ऐतिहासिक मंदिर पाडल्याने, जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी जैन बांधवांनी रस्त्यावर उतरून शांततेने रॅली काढली. या आंदोलनात मोठ्या संख्येने जैन समाजातील नागरिक सहभागी झाले होते.

या आंदोलनात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही सहभाग घेतला. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आजवर कधी जैन समाजाचा आवाज ऐकला होता का? इतका शांतताप्रिय समाज जर आज रस्त्यावर उतरला असेल, तर त्यामागे मोठं दु:ख आणि अन्याय दडलेला आहे,” असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
गायकवाड पुढे म्हणाल्या की, “ज्या अधिकाऱ्याने मंदिर पाडण्याची ही कारवाई केली, त्याच्यावर कारवाई केली जावी, ही जैन समाजाची योग्य मागणी आहे. सकाळच्या वेळेस दोन जेसीबी आणून अचानक कारवाई करण्यात आली. महिलांवर धक्काबुक्की झाली. या प्रकाराचा सर्वत्र निषेध होतो आहे.”
सरकारच्या दुहेरी भूमिकेवरही त्यांनी जोरदार टीका केली. “बेकायदेशीर गोष्टींना समर्थन देणाऱ्या सरकारने कायदेशीर मंदिरावर कारवाई केली आहे. त्यामुळे जैन समाजाला संताप व्यक्त करावा लागला आहे. राजस्थानपासून मुंबईपर्यंत जैन समाजाच्या मोर्चांनी सरकारला जाग आणली आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांचा या रॅलीत सहभाग असण्यावर गायकवाड म्हणाल्या, “हे फारच आश्चर्यजनक आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक स्वतःच त्यांच्या सरकारविरोधात आंदोलनात सहभागी होत आहेत. श्रद्धास्थळांचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असते, पण इथे मात्र पूर्वनियोजित षडयंत्राच्या माध्यमातून मंदिर उद्ध्वस्त केले गेले.”
तिने स्पष्टपणे सांगितले की, जैन समाज हा कायम शांततेचा मार्ग अवलंबतो. परंतु जेव्हा त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात होतो, तेव्हा त्यांनाही संघर्ष करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी गायकवाड यांनी केली.