कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बसेसवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या बसवर हल्ला केला आणि काळं फासून चालकाला मारहाण केली. हा प्रकार भाषिक वादातून घडल्याचे समजते. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

परिवहन मंत्र्यांची प्रतिक्रिया: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. “वाद वाढू नये म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. काही गुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राच्या बसवर हल्ला केला आहे, मात्र हे योग्य नाही. कर्नाटकातील बसेसही महाराष्ट्रात येतात, त्यामुळे अशा घटनांना आम्ही प्रतिसाद देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सरनाईक पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद काही नवीन नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही यापूर्वी याच विषयावर संघर्ष करताना तुरुंगवास भोगावा लागला होता. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत. आम्ही अशा घटनांकडे दुर्लक्ष करणार नाही.”
तसेच, या हल्ल्यात सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकमधील हल्ल्याची पार्श्वभूमी: कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड भाषेचा मुद्दा पुढे करत महाराष्ट्राच्या बसवर हल्ला केला. हल्लेखोरांनी बसला काळं फासलं आणि चालकाला कन्नड भाषा येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या विविध भागांतून संताप व्यक्त केला जात असून, राज्य सरकारकडून कर्नाटक प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढील काही दिवसांत यावर अधिकृत पातळीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.