गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या एका बॅनरमुळे हा वाद चांगलाच पेटला आहे. उत्तर भारतीय नेत्यांनी मनसेवर बंदीची मागणी केल्यानंतर, यास उत्तर देताना मनसेने मुंबईच्या दादर परिसरात एक ठळक बॅनर उभारला होता.

या बॅनरमध्ये महाराष्ट्रातील ४८ मराठी खासदारांवर उपरोधिक टीका करत, त्यांनी मराठी अस्मितेसाठी गप्प राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. “राज ठाकरे मराठीसाठी लढतो, पोलिस केस अंगावर घेतो, पण संसदेत जेव्हा एका परराज्यातील खासदाराने मनसेवर बंदीची मागणी केली, तेव्हा मराठी खासदार गप्प का बसले?” असा थेट सवाल या बॅनरमध्ये उपस्थित करण्यात आला होता.
बॅनरमध्ये मराठी खासदारांवर “लाचारीचा बोळा तोंडात घालून गप्प बसलेले गुलाम” अशा शब्दांत टीका करण्यात आली होती, ज्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनला.

दरम्यान, हे वादग्रस्त बॅनर आता हटवण्यात आले आहे. मात्र, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बॅनर काढण्यात आल्याने नवीन चर्चांना आणि चर्चेच्या फैलीला आणखी गती मिळाली आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना भवनासमोर ‘मराठी भाषा शिकण्याची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली असून, त्याचेही बॅनर लावण्यात आले आहेत.
राज्यातील या ताज्या घडामोडींमुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.