शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भव्य रॅलीने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. या रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर दिसल्याने, अनेकांचे राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
या रॅलीचे आयोजन शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी केले होते. त्यांनीच राज ठाकरे आणि संजय राऊत यांना निमंत्रण दिलं होतं. विशेष म्हणजे, राज ठाकरे या कार्यक्रमात उपस्थित राहणार की नाही, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, त्यांनी जयंत पाटलांच्या आमंत्रणाचा मान राखत रॅलीला हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात वेगळाच राजकीय रंग चढला.

या संदर्भात जयंत पाटील म्हणाले, “राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग नसले तरी आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आहोत. म्हणूनच वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना बोलावलं.” त्यांनी असंही स्पष्ट केलं की, शेकापचे अनेक नेते इतर पक्षात गेले असले तरी कार्यकर्ते आजही पक्षाच्या पाठीशी उभे आहेत.
दरम्यान, यापूर्वी ‘मराठी विजयी मेळावा’च्या निमित्ताने तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. त्यानंतर राजकीय युतीबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि प्रवक्त्यांना युतीसंदर्भात कोणतेही वक्तव्य न करण्याचा आदेश दिला होता. यानंतर काही दिवसांनीच ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्रीवर पोहोचले होते.
या सर्व घडामोडींमुळे राज ठाकरे यांची भूमिका आणि त्यातील बदल हे विरोधकांसाठी नव्याने चिंतेचं कारण ठरू लागले आहे.