मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत, सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी एका “पैलवान मंत्र्याने” एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

गंभीर आरोप आणि मंत्रिमंडळातील वादग्रस्त चेहरे
विजय वडेट्टीवार यांच्या मते, संबंधित मंत्री महिलेला अश्लील फोटो पाठवून तिला ब्लॅकमेल करत होते. एवढेच नाही तर, त्यांनी या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतरही त्याच महिलेच्या मागे लागण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण गंभीर असून, अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देणे ही महाराष्ट्र सरकारची मोठी चूक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
त्यांनी आणखी एका मंत्र्यावर निशाणा साधत, “उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या 26 एकर जमिनीवर कब्जा केला आहे.” असा दावा केला. यावरून राज्यातील सत्ताधारी नेत्यांची नैतिकता कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारवर तीव्र टीका आणि मागण्या
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारच्या मंत्रिमंडळात काळ्या धंद्यांशी संबंधित मंत्र्यांची संख्या वाढत आहे. अशा व्यक्तींना मंत्री म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरले.
अबू आझमी आणि भाजपवरही टीका
याच वेळी, वडेट्टीवार यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि भाजपवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, काल झालेल्या एका घटनेवरून लक्ष वळवण्यासाठी अबू आझमी आणि भाजपने मॅच फिक्सिंग केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच, भाजपने काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर गप्प का आहे, असा सवालही त्यांनी केला.
राजकीय वातावरण तापले
वडेट्टीवारांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सरकारकडून या आरोपांवर कोणते स्पष्टीकरण दिले जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता संबंधित मंत्री किंवा सरकार यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.