पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा निषेध करत पुण्यात विविध ठिकाणी निदर्शने झाली. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कदम यांनी पोलिसांनी त्यांच्या जबाबदारीत कोणतीही कसूर केलेली नाही, असे स्पष्ट केले. घटनास्थळी पोलिसांनी वेळोवेळी गस्त घातली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पोलिसांना दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या खासगी सुरक्षा व्यवस्थेवर टीका
गृह राज्यमंत्र्यांच्या मते, या घटनेसाठी मुख्य जबाबदारी एसटी महामंडळाने नियुक्त केलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची आहे. एसटी डेपोची सुरक्षा पुरवण्याचे काम हे खासगी एजन्सीमार्फत केले जात होते, मात्र त्यांनी आपल्या जबाबदारीत हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या सुरक्षा व्यवस्थेची देखरेख करण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरची होती, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेच्या वेळी परिसरात होते प्रवासी
मंत्री कदम यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. घटनेच्या वेळी बसच्या आसपास 10-15 प्रवासी उपस्थित होते, मात्र कोणताही प्रतिकार झाल्याचे दिसत नाही. प्रतिकार झाला असता, तर प्रवाशांनी मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित होते. यामुळे आरोपीने गुन्हा करण्याची संधी मिळाली.
सरकारी पातळीवर कारवाईची आश्वासन
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा केली जाणार असल्याचे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. तसेच, खासगी सुरक्षा यंत्रणांवर अधिक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.