धुळे जिल्ह्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड सापडल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंदाज समितीच्या दौऱ्यावर आलेल्या आमदारांना वाटप करण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपये या विश्रामगृहात आणण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन खोतकरांवर ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

खास म्हणजे, खोली क्रमांक 102 ही खोतकर यांचे खासगी सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर नोंदवलेली असल्याचे समोर आले. त्यामुळे खोतकर यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हे सर्व प्रकरण पुढे येताच, मंत्री अर्जुन खोतकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही काही नवीन बाब नाही, अशा प्रकारचे आरोप काही नेत्यांची जुनी सवय आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, हे सर्व राजकीय डावपेच असून, सरकार आणि अंदाज समितीची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती सध्या तीन दिवसांच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. एकूण 29 आमदार या समितीमध्ये आहेत आणि त्यामधील 11 आमदार या दौऱ्यावर सहभागी आहेत. या समितीचे नेतृत्व खुद्द अर्जुन खोतकर करत आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, खोली क्रमांक 102 मध्ये आमदारांना वाटपासाठी रक्कम ठेवण्यात आल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला.
गोटे यांनी खोलीबाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोलीचे कुलूप कटरने फोडण्यात आले. तपासणीदरम्यान या खोलीतून 1 कोटी 84 लाख रुपये रोकड सापडल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले असून, त्याचा पंचनामा करून ती रक्कम जमा करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी काळात या प्रकरणाचा तपास कोणत्या वळणावर जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.