संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी नवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात मोठी मागणी केली आहे. त्यांनी “धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी” असे स्पष्टपणे सांगितले आहे.

“राजीनामा हा शेवट नाही”
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता जात, धर्म आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका युवा सरपंचाच्या हत्येचा न्याय मिळवण्यासाठी तीन महिन्यांपासून संघर्ष करत आहे. त्या संघर्षाच्या परिणामस्वरूपच आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, हा शेवट नाही, त्यांना सहआरोपी केले पाहिजे.”
“खंडणीचे मुळ तिथूनच सुरू”
रोहित पवार पुढे म्हणाले, “भाजपच्याच एका आमदाराने म्हटले होते की, या प्रकरणातील खंडणीचा सूत्रधार धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होता. त्यांच्या घरीच या संदर्भात काही बैठकाही झाल्या होत्या. जर संपूर्ण कटाची सुरुवात तिथे झाली असेल, तर त्यांना सहआरोपी करणे आवश्यक आहे.”
“कारवाईसाठी सरकारला निर्णय घ्यावा लागेल”
याप्रकरणात आता सरकारने पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. “सत्य बाहेर यायला हवं आणि संपूर्ण दोषींवर कारवाई झाली पाहिजे” असे ते म्हणाले.
या मागणीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. आता सरकार आणि तपास यंत्रणांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.