महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्यावर वाढत्या दबावामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

या संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत सरकारवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी याप्रकरणी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाकरेंनी सांगितले की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या प्रकरणावर आधीच आपली भूमिका मांडली आहे. मात्र, सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सरकारकडे आधीपासून होते का?
राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. जर मुख्यमंत्री खरोखरच पारदर्शक कारभार करत असतील, तर त्याचे स्वागत आहे. पण त्यांना कुणीतरी रोखत आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.”
जनतेचा सरकारवर वाढता रोष
ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका करताना असेही नमूद केले की, महाराष्ट्रातील जनतेला आता या प्रकारच्या राजकीय घडामोडींचा कंटाळा आला आहे. लोकांना आपल्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे, केवळ एकमेकांच्या चुका झाकणारं नव्हे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जाब विचारणार असून लोकहिताच्या मुद्यांवर आवाज उठवणार, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.