राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीविषयी गेले काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याच्या बातम्यांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चिंता पसरली होती. मात्र, अखेर स्वतः धनंजय मुंडे यांनी पुढे येत यावर स्पष्टीकरण दिलं आहे आणि सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत सांगितलं की, “मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही. प्रत्यक्षात मला दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला होता. या आजाराचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर झाल्याने अजूनही बोलताना थोडा त्रास होतो आहे.” काही वृत्तवाहिन्यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका विधानावरून चुकीची माहिती प्रसारित केल्याने ही संभ्रमावस्था निर्माण झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.
मुंडे यांनी यावेळी आणखी स्पष्ट केलं की, काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी आपल्या तब्येतीबाबत विचारपूस केली होती. पाटील यांनी काळजी व्यक्त केली, याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, ही काळजी अर्धांगवायूच्या दृष्टीने नव्हती तर पूर्वी झालेल्या आजाराच्या पार्श्वभूमीवर होती. सध्या नव्याने कोणताही आजार झालेला नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, शिरूर कासार तालुक्यात पिंपळनेर येथे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहू शकले नव्हते. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनीही त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले होते की, “धनंजय मुंडे यांच्या गालावरून वार गेलं आहे, त्यांना बोलणं कठीण जात आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.” या विधानानंतर धनंजय मुंडे यांच्या आजाराबाबत राज्यभरात वेगाने चर्चेला उधाण आले.
परंतु, या सर्व चर्चा आणि अफवांना धनंजय मुंडे यांच्या थेट स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी सांगितलं की, बेल्स पाल्सीमुळे चेहऱ्यावर आणि वाणीवर परिणाम झाला असला तरी ते सध्या बऱ्याच अंशी बरे आहेत आणि कोणताही नवीन गंभीर त्रास झालेला नाही. त्यांच्या या खुलाशामुळे समर्थकांनीही मोठा दिलासा घेतला आहे.
सध्या धनंजय मुंडे उपचार घेत असून लवकरच पूर्णपणे ठणठणीत होऊन आपल्या सार्वजनिक कार्यात पुन्हा सक्रिय होतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.