राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या धनंजय मुंडे प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मोठे विधान केले आहे. “मी १०० टक्के खात्रीने सांगतो की धनंजय मुंडे यांनी कोणताही खून केलेला नाही. मात्र, या गटाला राजकीय पाठबळ देण्याचे कार्य त्यांनी नकळत केले आहे,” असे आव्हाड यांनी ठामपणे सांगितले.
भगवानगडाच्या भूमिकेवर चर्चा वाढली
भगवानगडाच्या भूमिकेबाबत सध्या मोठी चर्चा सुरु आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिल्यानंतर, राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वारकरी संप्रदायातील एका प्रमुख संस्थेने राजकीय भूमिका घेतल्यामुळे यावर अनेक स्तरांवर मतभेद दिसून येत आहेत.
नामदेव शास्त्रींना थेट प्रश्न
जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्रींना थेट सवाल करत, “संगीत दिघोळे, काकासाहेब गर्जे, महादेव मुंडे, बापू आंधळे, बंडू मुंडे यांचे हत्येचा न्याय मिळणार आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, महादेव गिते, सहदेव सातभाई, राजाभाऊ नेहरकर, बबन गिते, शिवराज बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यांकडेही लक्ष वेधले.
‘परंपरेला धक्का लागू नये’ – आव्हाड
भगवानगडाच्या गादीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत आव्हाड म्हणाले, “या गादीने नेहमीच सामाजिक न्यायाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या या गादीच्या परंपरेला धक्का लागू नये, ही माझी इच्छा आहे.”
अजितदादांवरही निशाणा
अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करत आव्हाड म्हणाले, “अजितदादा म्हणतात की कुणी चुकी करत असेल तर मोक्का लावेन, पण त्यांनीच मोक्यातील आरोपी सोडल्याचे कबूल केले आहे.” तसेच, “वाल्मीक कराडला सोडण्याचा निर्णय चुकीचा होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडेंवर काय म्हणाले?
“धनंजय मुंडेंना कुठल्याही प्रकारे अडकवता येणार नाही, याची आम्हालाही जाणीव आहे,” असे म्हणत आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली.