बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस हे दोघे, काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. मात्र आज ते पहिल्यांदा एका मंचावर एकत्र येणार आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता चर्चेत आहे.

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीड जिल्ह्यात मोठा गहजब झाला होता. या घटनेनंतर आमदार सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दोन्ही नेत्यांमध्ये यानंतर तणाव वाढला. काही दिवसांपूर्वी दोघांची गुप्त भेट झाली असली, तरी ती भेटही वादग्रस्त ठरली आणि धस यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दोघांमधील दरी आणखी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं.
आता मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे संत भगवान बाबा गडावर नारळी सप्ताहाचा समारोप होतो आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी दोन्ही नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून, ते एकाच व्यासपीठावर हजर राहणार आहेत. यामुळे, दोघांमध्ये काही सकारात्मक संवाद घडून येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महंत नामदेव शास्त्री यांच्या किर्तनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद घडेल का, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. सामाजिक सलोखा साधण्यासाठी नामदेव शास्त्री हे काही प्रयत्न करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता, बीड जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.
विशेष म्हणजे, धनंजय मुंडे स्वतः हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहेत. तर आमदार सुरेश धसही ठरलेल्या वेळेनुसार उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांची मंचावर होणारी पहिलीच भेट जिल्ह्यातील कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय विश्लेषक यांच्यात प्रचंड उत्सुकतेचं केंद्रबिंदू बनली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हा विषय चर्चेचा झाला आहे. दोन कट्टर विरोधक एका मंचावर आल्यावर ते हातमिळवणी करतात का, की पुन्हा एखादा वाद उफाळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे आजचं पिंपळनेरमधील वातावरण केवळ धार्मिक नसून, त्यात एक मोठा राजकीय रंगही चढलेला आहे.