छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पक्षाच्या कार्यक्रमात खैरे यांना आमंत्रित न केल्याने ते नाराज असून, त्यांनी याबाबत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

“दानवे फक्त चार महिन्यांचे पाहुणे” – खैरेंचा टोला
खैरे यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की, “मला कार्यक्रमाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अंबादास स्वतःला मोठा समजतो, पण त्यांचं विरोधी पक्षनेतेपद केवळ चार महिन्यांचेच राहणार आहे.” यावरून त्यांच्या संतप्त भावना स्पष्ट झाल्या.
“नंतर आलेले आणि फक्त काड्या करण्याचे काम” – खैरे
खैरे यांनी दानवे यांच्यावर आरोप करताना म्हटलं, “हे नेते नंतर पक्षात आले आणि आताच गोंधळ घालू लागले आहेत. अशा वागणुकीमुळे नाराजी वाढत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे.”
दानवे यांचे उत्तर : “मी काही बोलणार नाही”
दुसरीकडे, अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना खूपच संयमित भूमिका घेतली. “कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत खैरे यांचे नाव मी मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केलं होतं. तरीही ते आले नाहीत, तर मी काय करणार?,” असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. तसेच, खैरे यांच्याविषयी बोलणे टाळत, “मी यावर कुठलाही प्रतिसाद देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.