विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत 20 फेब्रुवारीला शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ठाकरे गटावर टीका
जनावळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मला विलेपार्ले विधानसभा लढवायची होती, पण सहा वर्षे मला बाहेर ठेवण्यात आलं. संजय राऊत आणि अनिल परब यांनी हा निर्णय का घेतला?” त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंना भेटून आपली नाराजी व्यक्त केली.
मातोश्रीसमोर नतमस्तक का झाले?
उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना जनावळे यांनी मातोश्रीसमोर डोकं टेकवून नमस्कार केला, त्यामुळे हा विषय चर्चेत आला. यावर ते म्हणाले, “मातोश्री हे माझ्यासाठी मंदिर आहे. मंदिराच्या उंबरठ्यावर माणूस झुकतो. मी तिथं पाया पडलो, आता ज्याला समजायचंय त्याने समजून घ्यावं.”
शिंदे गटात जाण्याचा निर्णय निश्चित
त्यांच्या या कृतीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून, ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटाला मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जनावळे यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.